आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
अगदी प्राचीन काळापासूनच भारतात संगीत, साहित्य, कला आणि तत्वज्ञानाची परंपरा अबाधित आणि श्रेष्ठ राहिली आहे. कालिदासांसारख्या साहित्यिकांनी तर जागतिक दर्जाची साहित्यरचना केली. वैदिक संस्कृतीचे केंद्र असलेले वेदसुद्धा ‘सामवेदाच्या’ माध्यमातून संगीत आणि साहित्याची चर्चा करतात.
संगीत आणि साहित्याविना मानवी जीवन बेरंगी आणि धूसर आहे. तत्वज्ञानातही पुढे जायचे असल्यास त्याची पहिली पायरी साहित्य म्हणजेच ग्रंथसंपदा हीच असते. असे हे संगीत, साहित्य आणि कला संस्कृती इत्यादींशी निगडित लोक रूढी आणि परंपरांच्या बंधनांच्या पुढे जाऊन आपले काम करतात.
असाच एक महान सुफी साहित्यिक भारतात होऊन गेला ज्याने हिंदवी भाषेत पहिल्यांदा सुफी साहित्य रचले. सुफी पंथामध्ये लाखो कवी होऊन गेले. अमीर खुसरो यांचे सुफी कवींमध्येही मोठे नाव आहे. त्यांना सुफी कव्वालीचे जनक म्हणूनही ओळखले जाते.
कोणत्याही सुफी दरबारात आयोजित कव्वालीमध्ये जोपर्यंत अमीर खुसरो यांनी रचलेला शेर वाचला जात नाही तोपर्यंत त्या ‘मेहफलीला’ पूर्णत्व येत नाही. खुसरोने गझल मसनवी, काटा, रुबाई इत्यादींसह जवळजवळ प्रत्येक प्रकारच्या कविता लिहिल्या. भारतीय उपखंडातील कला आणि संस्कृतीच्या विकासात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
खुसरो यांनी त्यांच्या साहित्यामध्ये फारसी शब्दांसह हिंदी आणि इतर हिंदवी शब्दांचाही वापर केला. कदाचित यामुळेच त्याला खारी बोलीचे जनक आणि पहिले कवी मानले जाते. बॉलिवूडचे अनेक दिग्गज संगीतकारही त्यांच्या गायनात खुसरो यांच्या कव्वाली वापरत आहेत, मग ते महान गायक मोहम्मद रफी असोत किंवा राहत फतेह अली खान. तथापि, दिल्ली सल्तनतीच्या अनेक सुलतानांच्या दरबारात एक कवी, साहित्यिक आणि विद्वान म्हणून खुसरो यांचा मोठा वाटा होता, पण त्यांनी स्वतःला पूर्णपणे सुफी रंगात रंगवून घेतले होते.
उत्तर प्रदेशातील एटाहच्या पटियाली शहरात १२५३ साली अमीर खुसरो यांचा जन्म झाला. त्याचे खरे नाव अबुल हसन यामीनुद्दीन होते. त्याचे वडील, अमीर सैफुद्दीन महमूद, चंगेज खानच्या राजवटीत तुर्कस्तानमधील ‘लाचिन’ नावाच्या जमातीचे सरदार होते, जे नंतर भारतात स्थायिक झाले. त्याचे वडीलही सुफी विचारसरणीने प्रभावित झाले होते. भारतात परतल्यानंतर, त्याच्या वडिलांची सुलतान शमसुद्दीन इल्तुतमिशच्या दरबारात उच्च अधिकारी म्हणून नेमणूक झाली. तर त्याची आई नवाब इमादुल मुल्कची मुलगी होती.
त्याच्या वडिलांना आपल्या मुलाला चांगले शिक्षण द्यायचे होते, त्यासाठी त्याने अमीरला वयाच्या चौथ्या वर्षीच एटाहून दिल्लीला आणले. त्याने खुसरोसाठी उत्तम शिक्षण पद्धतीची व्यवस्था केली. दिल्लीत असतानाच वयाच्या नवव्या वर्षी त्याच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या मृत्यूनंतर खुसरो आपल्या आजोबा, इमादुल मुल्क यांच्याकडे राहिले. पुढे, खुसरूने कला आणि साहित्य तसेच खगोलशास्त्र, तत्त्वज्ञान, धर्म, गूढवाद आणि इतिहास यांचे शिक्षण घेतले.
खुसरोचे बालपण संगीतमय वातावरणात गेले. याच संगीतमय वातावरणाचा त्याच्यावर परिणाम झाला आणि नंतर खुसरोला कविता हा आपला छंद बनवायचा होता. त्यांनी वयाच्या १२ व्या वर्षी कविता लिहायला सुरुवात केली. वयाच्या अवघ्या २०व्या वर्षीच त्यांचे नाव प्रसिद्ध कवींमध्ये समाविष्ट झाले.
सुरुवातीला त्यांनी फारसी, अरबी आणि उर्दू भाषा आपल्या साहित्यात वापरल्या. परंतु काही काळानंतर त्यांनी हिंदी आणि ब्रज यांसारख्या अनेक बोली आणि भाषांवर प्रभुत्व मिळवले. मग त्यांनी आपल्या साहित्यामध्ये उर्दू आणि हिंदीचा मिलाप केला. त्याच्या साहित्यामध्ये हिंदवी भाषा चांगली वापरली गेली. यामुळेच तो इतर कवींपेक्षा निराळा होता. खुसरोने हजारो जुनी वाद्ये, तबला पुनरुज्जीवित केली होती. काही इतिहासकारांच्या मते पखावाजचे दोन तुकडे करून त्याने नवीन तबल्याचा शोध लावला.
अमीर खुसरोच्या वडिलांनी केवळ शाही दरबारात प्रतिष्ठाच प्राप्त केली नाही, तर सुफी विचारसरणीशी सुसंगत मानवी व्यवहार देखील केले. कुटुंबाच्या सहवासाचा स्पष्ट परिणाम खुसरोच्या जीवनातही दिसून येतो. खुसरो ८ वर्षांचे असताना, त्यांचे वडील त्यांना तत्कालीन महान सूफी हजरत निजामुद्दीन औलिया यांच्या दर्ग्यात घेऊन गेले. खुसरोचे वडील आणि मामा दोघेही हजरत निजामुद्दीनचे मुरीद (भक्त) होते. त्यांनी हजरत निजामुद्दीन औलिया यांना आपले आध्यात्मिक गुरू मानले आणि सुफी विचारसरणीचे अनुसरण करण्यास सुरुवात केली.
आजही त्यांचे साहित्य सुफी-संतांच्या दरबारातील कव्वालींमध्ये मोठ्या प्रमाणात वाचले जाते. कव्वालीच्या शेवटी एक रंग वाचला जातो, जो अमीर खुसरो यांनी लिहिला आहे, “आज रंग है री मा, रंग है री”. यासह, “मन कुन्तो मौला,अली मौला” आणि “छाप तिलक सब छीनी रे मोसे नैना मिलाइके” यांसारख्या ओळी आजही वापरल्या जातात, अगदी बॉलिवूडच्या गाण्यांतही.
खुसरोने गंगा-जमना तेहजीबची झलकही त्याच्या साहित्यामध्ये मोठ्या सौंदर्याने सादर केली आहे. यासोबतच त्यांच्या साहित्यामध्ये देशभक्तीची भावना दिसून येते. आपल्या गझलींमध्ये त्यांनी भारतातील राहणीमान आणि संस्कृतीबरोबरच भारतीय पक्ष्यांवरील प्रेम व्यक्त केले आहे. भारतीय विविधता डोळ्यासमोर ठेवून खुसरो यांनी त्यांचे साहित्य अतिशय उत्तम प्रकारे सादर केले.
खुसरोच्या साहित्याने अनेक सुलतानांना नशा चढली होती, त्यामुळे अमीर खुसरो अनेक सुलतानांच्या दरबाराचे सौंदर्यही राहिले. यामध्ये बादशहा गियासुद्दीन बलबनचे पहिले नाव येते. बलबनचा मोठा मुलगा सुल्तान मुहम्मद कला आणि साहित्याचा चाहता होता, म्हणून तोही त्याच्याबरोबर राहू लागला. जेव्हा मुहम्मदला मंगोलांशी लढण्यासाठी मुलतानला जावे लागले, तेव्हा तोही त्याच्याबरोबर गेला. या युद्धात सुलतान ठार झाला, तर खुसरोला कैद करण्यात आले.
तथापि, तो कसा तरी मंगोल लोकांच्या तावडीतून पळून जाण्यात यशस्वी झाला. नंतर पुन्हा दिल्लीला परत आला आणि त्याने बलबनला युद्धाची संपूर्ण कहाणी सांगितली. त्यानंतर बलबन आजारी पडला आणि त्याचा मृत्यू झाला. यानंतर तो दुसऱ्या दरबारातही कवी बनून राहिला, त्याठिकाणी त्याला मुल्क-शोआराचा (राष्ट्रीय कवी) दर्जा देण्यात आला. या काळात दिल्लीची सत्ता जलालुद्दीन खिलजीच्या हातात आली, त्यानंतर तो जलालुद्दीनच्या दरबाराचा भाग बनला.
जलालुद्दीनचा वधझाल्यानंतर, जेव्हा अलाउद्दीनने दिल्ली सल्तनत ताब्यात घेतली, तेव्हा त्याने खुसरोलाही त्याने आपल्या दरबारात समाविष्ट केले. पुढे, गियासुद्दीन तुघलकाने खिलजी घराण्याची सत्ता उलथवून टाकली आणि दिल्लीचा सुलतान झाला. मग तुघलकाने त्याला आपल्या दरबाराचे सौंदर्य राखण्याची विनंती खुसरोला केली. त्यानंतर खुसरोने तुघलक वंशातही आपल्या कविता प्रसिद्ध केल्या.
विशेष म्हणजे खुसरो तब्बल तीन राजवंशांच्या ११ राजांच्या दरबारात होता, परंतु या बादशहांच्या राजकीय षडयंत्रांचा कधीही भाग बनला नाही. त्याच्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहून सर्व बादशहांनीही त्याचा आदर केला. मग तो आधीच्या सुलतानांचा शत्रू किंवा खुनी असला तरीही. यावरून त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि मोठेपणाचा अंदाज येऊ शकतो. त्यांनी नेहमी सुफी विचारधारेचे समर्थन केले आणि संपूर्ण जनतेबद्दल सहानुभूतीही दाखवली. निजामुद्दीन औलियाच्या शिकवणीचा हा प्रभाव होता.
खुसरो हे जितके महान कवी होते तितकेच ते व्यक्तिमत्त्वानेही समृद्ध होते. कारण त्याने नेहमी आपल्या पीर हजरत निजामुद्दीन औलियाच्या वचनांचे पालन केले होते. निजामुद्दीन औलियाने नेहमी ऐक्य आणि बंधुत्वावर भर दिला आणि गरीब आणि अनाथांना मदत करण्याचा संदेश दिला. म्हणूनच अमीर खुसरोंबद्दलची ही माहिती निजामुद्दीन औलियाशिवाय अपूर्ण राहील. लहानपणापासूनच खुसरो निजामुद्दीन औलियाच्या वचनांचे पालन करीत होता, त्यानंतर खुसरूचे त्याच्या पीरवरचे प्रेम ‘दो जिस्म एक जान’सारखे होते.
त्यांनी त्यांच्या पीरसाठी आणि त्याच्या प्रसिद्धीसाठी अनेक गाणी लिहिली, जी मनोरंजक आहेत. आपल्या प्रियकरासाठी खुसरोने केलेल्या कविता अप्रतिम आहेत, म्हणूनच त्याने त्याच्या पीरसाठी लिहिलेले साहित्य आजही लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. हजरत निजामुद्दीनलासुद्धा खुसरोबद्दल खूप आपुलकी होती, ते म्हणाले होते की जर कोणी मला माझ्या डोक्यावर खंजीर घालून खुसरोची बाजू सोडण्यास सांगितले तर मी माझा प्राण देईल, पण खुसरोची बाजू सोडणार नाही.
त्यांच्या एकमेकांवरील प्रेमाचा आणि आपुलकीचा अंदाज आपल्याला या घटनेने येईलच. जेव्हा खुसरो गियासुद्दीन तुघलक बरोबर बंगालमध्ये यु*द्धासाठी गेला, तेव्हाच त्याला त्याच्या मेहबूबच्या (हजरत निजामुद्दीन औलियाच्या) मृत्यूची बातमी मिळाली. ही बातमी मिळाल्याबरोबर लगेच ते तेथून दिल्लीला रवाना झाले. दिल्लीला परतल्यावर स्वतःकडे जे काही होते ते त्यांनी गरिबांमध्ये वाटून टाकले. मग काळे वस्त्र परिधान करून तो आपल्या गुरूच्या कबरीवर बसून, त्याच्या आठवणीत अश्रू ढाळू लागला. तेव्हा त्यांनी या ओळी म्हटल्या: “गोरी सोवे सेज पर मुख पर डारे केस, चल ख़ुसरो घर आपने सांझ भई चहुं देस.”
यानंतर खुसरोला त्याच्या पीरच्या विभक्त होण्याने दुःख वाटू लागले आणि शेवटच्या क्षणात तो फक्त त्याच्या पीरच्या कबरीवरच राहू लागला. १३२५ साली, हजरत निजामुद्दीन औलियाच्या मृत्यूनंतर ६ महिन्यांनी खुसरोंनीही जगाचा निरोप घेतला. मग निजामुद्दीन औलियाच्याच इच्छेनुसार त्याची कबरही हजरत निजामुद्दीनच्या कबरीजवळच त्याची कबर बांधण्यात आली.
अमीर खुसरोनी अनेक साहित्यरचना केल्या आणि त्यांच्या पीर सोबत मानवतेच्या तसेच गंगा-जमुनी तेहजीबच्या गोष्टींना प्रोत्साहन दिले. अजूनही या गोष्टींचा प्रभाव त्यांच्या थडग्यांवर दिसतो. प्रत्येक धर्माचे लोक हजरत निजामुद्दीन औलिया आणि अमीर खुसरो यांच्या समाधीला त्यांच्या श्रद्धेनुसार भेट देतात.
इस्लाम धर्मातील सुफी पंथ शिया आणि सुन्नी या इस्लामच्या दोन्ही शाखांचा सदस्य आहे. पण इस्लामच्या इतर शाखांमध्ये आणि विचारधारांमध्ये अल्लाह अर्थात ईश्वर आणि मनुष्य यांना वेगळं मानलेलं असून, त्याच्याइतकं श्रेष्ठ कोणीही असू शकत नाही अशी विचारधारा आहे. म्हणूनच भारतातील मुघल सत्ताधीशांना ‘ईश्वर’ न मानता, त्याची सावली, निशाण किंवा रक्षक अशा पदव्या दिल्या जात. सुफी पंथामध्ये ईश्वर आणि मानवाला वेगळं न मानता त्यांना एकच मानले गेले आहे.
पण याच विस्तीर्ण संस्कृतीचा एक भाग म्हणजे सुफी पंथ. ऐतिहासिकदृष्ट्या, सुफीवाद इस्लाम सभ्यतेमध्ये “इस्लामचा एक महत्वाचा भाग” आणि “मुस्लिम जीवनातील सर्वात व्यापक” भाग बनला. भारत, इराक पासून बाल्कन आणि सेनेगलमध्ये इस्लामच्या सुफी तत्वज्ञानाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला. भारतात सुफी पंथाचे अनेक धर्मगुरू होऊन गेले. सुफी पंथ हिंदू धर्मातील अद्वैत तत्वज्ञानाशी काहीप्रमाणात सुसंगत असल्याने त्याला मान्यताही मिळाली.
भारतामध्ये सुफी पंथाची परंपरा मोठी आहे. काश्मीरमध्ये १९९०च्या आधी सुफी पंथ आणि काश्मिरी शैव पंथ गुण्यागोविंदाने नांदत असल्याच्या नोंदी आपल्याला सापडतात. महाराष्ट्रात देहूतील अनगडशहा, पुण्यातील खेड शिवापूर मध्ये कमर अली दुर्वेश, कोकणातील केळशीमध्ये याकूब असे अनेक सुफी पंथाचे संत होऊन गेले. सुफी पंथ शांतताप्रिय असून धर्मांध नसल्याने बहुतेकदा इस्लामच्या कट्टरपंथीयांकडून त्यांचा तिरस्कार होताना दिसतो.
स्वतःला इस्लामचा रक्षक, संवर्धक घोषित करणाऱ्या पाकिस्तानमधील सुफी संतांच्या दर्ग्यांवर अनेक दह*शतवादी ह*ल्ले झाले आहेत. मार्च २००५ पासून, पाकिस्तानमधील सूफी संतांच्या दर्ग्यांवर झालेल्या २९ वेगवेगळ्या द*हशतवादी ह*ल्ल्यांमध्ये २०९ लोक ठा*र झाले आणि ५६० लोक जखमी झाले. सुफी पंथाचे आशियामधील केंद्र असलेल्या कश्मीरमध्ये नोव्हेंबर २०१२ पर्यंत आगींमध्ये सहा सुफी प्रार्थनास्थळे पूर्णपणे किंवा अंशतः जळून गेली आहेत. यामध्ये सर्वात प्रमुख श्रीनगरमधील दस्तगिरे साहिब सूफी मंदिर जून २०१२ मध्ये जाळण्यात आले आणि सुमारे २० लोक यामध्ये जखमी झाले.
खरंतर इस्लाम मधील सुफी पंथाची विचारधारा ही कट्टरतावाद आणि दह*शतवादाला मोठे आव्हान असल्याने असे हल्ले होत राहिले आहेत. म्हणूनच भारतासारख्या सहिष्णू देशाने कट्टरतावाद आणि दह*शतवादाच्या विचारांना संपवण्यासाठी सुफी तत्त्वज्ञानाचा अभ्यास आणि जगभरात प्रचार करायला हवा.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.