आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
भारत आणि चीन दरम्यान १९६२ साली घनघोर यु*द्ध सुरु होते. भारत ज्या अलिप्ततावादी चळवळीचा सदस्य होता, त्या संघटनेतील एकही देश भारताच्या बाजूने उभा राहिला नाही. नेहरूंची अपेक्षा होती की, ही संघटना भारताची बाजू घेईल आणि चीनच्या आक्रमक आणि विस्तारवादी साम्राज्यशाहीचा विरोध करेल. परंतु, या चळवळीकडून नेहरूंची घोर निराशा झाली.
तेव्हा अनपेक्षितपणे अमेरिका भारताच्या बाजूने उभा राहिला. अमेरिकेच्या दबावामुळे चीनने नमते घेतले. अमेरिका भारताच्या बाजूने उभा राहिला म्हणून चीन पुढे भारताचा टिकाव लागू शकला.
यावेळी अमेरिकेची मदत मिळवून देण्यात भारतातील अमेरिकन राजदूत जॉन केनेथ गेलब्रेथ यांनी महत्वाची भूमिका बजावली.
भारत आणि चीनमधील या यु*द्धादरम्यान गेलब्रेथ यांनी अमेरिकेचे सहाय्य मिळवून देण्यात नेहरूंची विशेष मदत केली. याकाळात ते नेहरूंची रोज भेट घेत होते. अमेरिकेकडून शक्य ती मदत मिळवण्यासाठी त्यांचे सर्व बाजूंनी प्रयत्न सुरु होते.
अमेरिका या यु*द्धात काय मदत करू शकते याबद्दलचे आडाखेही त्यांनी बांधले. गेलब्रेथ यांनी याकाळात अधिक सक्रियता दाखवल्याने अमेरिकेची मदत मिळवणे भारतासाठी जास्त सोपे गेले. गेलब्रेथ यांच्या या प्रयत्नांमुळे अमेरिकेने थेट भारताची बाजू घेतली, ज्यामुळे चीनवर एकप्रकारचे दडपण आले.
गेलब्रेथ भारतातील अमेरिकन राजदूत होते. ते एक विख्यात अर्थशास्त्रज्ञ देखील होते. त्यांनी अर्थशास्त्रावर लिहिलेली पुस्तके आजही बेस्ट सेलर आहेत. १९६२ साली भारत-चीन यु*द्ध झाले तेंव्हा जॉन एफ. कॅनेडी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. गेलब्रेथ आणि कॅनेडी यांच्यातील घनिष्ठ मैत्रीमुळेच गेलब्रेथ अमेरिकेला भारताच्या बाजूने वळवू शकले.
१९६१ साली त्यांची राजदूतपदी बढती करण्यात आली आणि त्यांची पहिलीच नियुक्ती भारतात झाली. कॅनेडी आणि गेलब्रेथ यांच्यातील मैत्रीमुळे ते कोणत्याही विषयावर बोलण्यासाठी कॅनेडी यांच्याशी थेट संवाद साधू शकत होते. अगदी औपचारिक निरोप देण्यासाठीही ते थेट राष्ट्राध्यक्ष कार्यालयाशी संपर्क साधत असत.
त्यांची नियुक्ती भारतात झाल्यानंतर नेहरूंचे आणि त्यांचे सूर एकदम चांगल्या प्रकारे जुळले. नेहरू भारतातील आर्थिक प्रश्नांबाबत अनेकदा गेलब्रेथ यांच्याशी चर्चा करत असत.
१९६१ ते १९६३ या दोन वर्षांच्या कालावधीत ते भारताचे राजदूत होते. परंतु भारतातून गेल्यानंतरही त्यांनी अनेकदा भारताचे समर्थन केले आणि भारताचे हितचिंतक राहिले.
भारतीय लोकांसाठी त्यांनी आणखी एक महत्वपूर्ण योगदान दिले. भारतीय लोकांच्या प्रगतीतही त्यांचा मोठा वाटा आहे. कानपूर येथील आयआयटी कॉलेजमध्ये कंप्युटर सायन्स विभाग सुरु करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.
त्यांनी केलेल्या मदतीमुळे कानपूर आयआयटीमध्ये कंप्युटर सायन्सचे शिक्षण मिळू लागले. तत्पूर्वी कानपूरमध्येच काय पण, भारतातील कोणत्याच शिक्षण संस्थेतून अशा प्रकारचे शिक्षण दिले जात नव्हते.
१९६२ साली जेंव्हा चीन आणि भारत यांच्यातील यु*द्ध सुरु होते तेंव्हा गेलब्रेथ यांनी राजकीय परिस्थिती, सैन्याची स्थिती आणि राजकीय डावपेच या सगळ्या गोष्टी ज्या त्यांनी अनुभवल्या त्या आपल्या डायरीत लिहून काढल्या. त्यांनी आपल्या डायरीचे प्रकाशनही केले. त्याच डायरीतील काही अंश –
२६ ऑक्टोबर १९६२, नवी दिल्ली,
“मी संध्याकाळी राष्ट्रपती राधाकृष्णन यांच्यासोबत फेरफटका मारत होतो. तेव्हा राष्ट्रपती फक्त चीनचाच विचार करत होते. भारताचे सरंक्षण मंत्री कृष्णा मेनन यांच्यावर चहूबाजूंनी टीकेचा भडीमार सुरु होता. ते सैन्यात राजकारण करत होते. सैन्याच्या अपेक्षा पूर्ण करण्यात, सैन्य अधिकाऱ्यांमधील असंतोष दूर करण्यात आणि सैन्याचे खचलेले मनोबल वाढवण्यात ये सपशेल अपयशी ठरले. कॅबिनेट मधील सर्व सदस्यांनी निर्णय घेतला होता. मेनन यांना संरक्षण मंत्री पदावरून हटवण्यासाठी ते नेहरूंना विनंती करणार होते. त्यांच्याकडून हे खाते लवकरच काढून घेण्यात येईल अशी सर्वांनाच अपेक्षा होती.”
राष्ट्रपतींनी गेलब्रेथ यांना विनंती केली की, या सगळ्या धुमश्चक्रीत अमेरिकेने पाकिस्तानला शांत राहण्यास सांगावे. अमेरिकेने पाकिस्तानवर थोडा दबाव आणल्यास पाकिस्तानकडून काही उचापती होणार नाहीत. याबाबतीत गेलब्रेथ यांनी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.
यानंतर दोन दिवसांनी गेलब्रेथ यांनी पाकिस्तानातील अमेरिकी दूतावासाशी संपर्क साधाला आणि पाकिस्तानातील अमेरिकन राजदूत मॅकॅथी यांना पाकिस्तानचे तत्कालीन प्रधानमंत्री आयुब खान यांची भेट घेण्यास सांगितले. त्याच्या सांगण्यानुसार मॅकॅथी यांनी अयुब खानची भेट घेऊन भारत-पाक सीमेवर शांतता राखण्यास सांगितले.
याच वेळी गेलब्रेथ यांनी नेहरूंची भेट घेतली. त्यांनी डायरीत या भेटीचे वर्णन केले आहे. त्यांनी लिहिल्यानुसार, “नेहरू काहीसे कमकुवत पडले आहेत असे जाणवत होते. असे वाटत होते की अचानक ते वृद्धत्वाकडे झुकले आहेत.”
नेहरूंनी गेलब्रेथ यांना सांगितले की, आम्हाला अमेरिकेकडून आणखी अपेक्षा आहे. यावेळी त्यांना रशियाची मदत अजिबात नको होती. नेहरू होईल तितके रशियापासून दूर अंतर राखण्याचा प्रयत्न करत होते.
अमेरिकेकडून आत्तापर्यंत काही लाख डॉलरची शस्त्रे आयात करण्यात आली होती. ही शस्त्रे भूदलाकडूनच वापरली जातील अशी होती. नेहरुंना अपेक्षा होती की, अमेरिकेने भारताला शस्त्रास्त्र निर्मितीसाठी कच्चा माल, ह*त्यारबंद उपकरणे आणि टँ*क द्यायला हवे होते. शिवाय, त्यांना वायुसेनाही उभी करायची होती. यासाठी किमान काही कोटी-अब्ज डॉलर्सची गरज लागणार होती.
त्यांनी चीनच्या वाढत्या विस्तारवादी धोरणांबद्दल अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष कॅनेडी यांना विस्तृत माहिती दिली. चीन आणि भारत यांच्यातील ही लढाई फक्त सीमावादापुरती मर्यादित नसून चीनला या प्रदेशात आपली ताकद वाढवायची आहे.
भारताला त्रास दिल्यास त्यांना कोणीही रोखू शकणार नाही आणि भारताच्या बाजूने कुणीही उभे राहणारे नाही, असे वाटत असल्याने चीनचे धारिष्ट्य वाढत आहे. या सगळ्या बाबी त्यांनी राष्ट्राध्यक्षांपर्यंत पोहोचवल्या.
इतकेच नाही तर त्यांनी स्वतः प्रत्यक्ष यु*द्ध स्थळावर जाऊन पाहणी केली. तिथल्या परिस्थितीचा अंदाज घेतला. याबद्दलही त्यांनी कॅनेडींना सविस्तर वृत्तांत पाठवला.
अमेरिकेची मदत मिळाल्यानंतर आणि चीनने माघार घेतल्यानंतर अमेरिकेची भारतातील प्रतिमा कशी बदलत आहे, याबद्दलही त्यांनी कॅनेडींना पत्राद्वारे कळवले.
या लढाई दरम्यान नेहरूही काहीसे डगमगले होते. पण, याकाळात अमेरिकेकडून झालेल्या मदतीमुळे भारताला फायदा झाला.
नेहरू अलिप्ततावादी धोरणाचे पुरस्कर्ते असल्याने त्यांना अमेरिकेची मदत मागण्यात कमीपणा वाटत होता. पण, गेलब्रेथ यांनी या परिस्थितीत स्वतः पुढाकार घेऊन अमेरिकेची मदत मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.