आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण चीनच्या वूहान शहरात आढळला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय प्रवासामुळे हा विषाणू जगाच्या कित्येक भागात पसरला. आज संपूर्ण जग या विषाणूच्या विळख्यात सापडले आहे. अशात आंतरराष्ट्रीय पातळीवर कोरोनाच्या प्रदुर्भावातून निर्माण झालेल्या जागतिक महामारीच्या स्थितीस चीनच जबाबदार असल्याचा पुनरुच्चार सातत्याने केला जात आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनला चोहोबाजूंनी विखारी टीका सहन कराव्या लागत आहेत. अशात चीनची आक्रमकता आणखीनच वाढत असल्याचे दिसत आहे. या आक्रमकतेतूनच चीन आपल्या आजूबाजूच्या विवादित क्षेत्रावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे.
दक्षिण चीनी समुद्रातील विवादानंतर आत्ता चीनने भारताच्या सीमेवरील अक्साई प्रदेशातील आपले नियंत्रण अधिक कठोर करण्याचा प्रयत्न करत आहे.
भारताने गलवान खोऱ्याच्या क्षेत्रातील सीमा पार करून चीनमध्ये घुसखोरी केल्याचा आरोप चीनने केला होता. चीन आणि भारतादरम्यानचा हा विवाद १९५० पासून सुरु आहे. अक्साई चीनचा हा प्रदेश तिबेटी पठाराच्या वायव्येस असून कुनलाणु पर्वताच्या पायथ्याशी आहे.
फार पूर्वी मध्य आशिया आणि भारता दरम्यान व्यापारासाठी प्रसिद्ध आसलेल्या सिल्क रूटचा हा एक भाग आहे. कित्येक शतके मध्य आशिया आणि भारत यांना सांस्कृतिक, व्यापारी आणि भाषिक अंगानी जोडणारा हा एक दुवा राहिला आहे.
अगदी ब्रिटीश काळापासून भारत आणि चीन दरम्यानची ही सीमा विवादास्पद राहिली आहे. भारत आणि चीन दरम्यानची आंतरराष्ट्रीय सीमा ही ३,४८८ किमी लांबीची आहे. ही सीमा जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या सहा राज्यांतून जाते.
ही सीमा तीन सेक्टर्समध्ये विभागलेली आहे – जम्मू-काश्मीरचा पश्चिम सेक्टर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडचा मिडल सेक्टर, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशाचा पूर्व सेक्टर.
चीन आणि भारत दरम्यानचा हा सीमावाद पार ब्रिटीश काळापासूनच सुरु असल्याचे दिसते. भारत आणि चीन हे दोन्ही देश ब्रिटीशांच्या वसाहतीचाच भाग होते. या देशांतील सीमा निश्चित करण्यासाठी ब्रिटीशांनी जॉन्सन रेषा आणि मॅकडोनाल्ड रेषा असे दोन पर्याय दिले होते.
जॉन्सन रेषेनुसार अक्साई चीन हा भारताचा भाग होता तर मॅकडोनाल्ड रेषेनुसार अक्साई चीन हा चीनचाच भाग असल्याचे मानले जाते.
परंतु, या दोन्ही रेषेनुसार आंतरराष्ट्रीय सिमेबाबत कोणताही करार करण्यात आला नाही. त्यामुळे या हा सीमाप्रश्न संदिग्धच राहिला. भारताने जॉन्सन रेषेनुसार अक्साई चीन हा भारताचा भाग असल्याचे गृहीत धरले. परंतु १९५० साली चीनने अक्साई चीनवर नियंत्रण मिळवले, तेव्हापासून हा सीमाप्रश्न चिघळतच राहिला आहे.
यानंतर चीनने या प्रदेशात अद्यायावत पायाभूत सुविधा निर्माण करण्यास प्रारंभ केला. भारताने याला विरोध दर्शवला. इथून चीन-भारत दरम्यानच्या उघड संघर्षाला प्रारंभ झाला. या वादावर तोडगा काढण्यासाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आखण्यात आली. मात्र दोन्ही देशांकडून दाखवण्यात येणाऱ्या या प्रत्यक्ष सीमारेषा भिन्न आहेत. यातही दोन्ही देशांमध्ये एकमत नाही.
सीमाच निश्चीत नसल्याने समोरच्या देशाने आपल्या सीमेत आक्रमण केले आहे, असे समजून दोन्ही देशांकडील सैन्य समोरासमोर उभे ठाकतात. यामुळे या प्रदेशात कायमच तणावग्रस्त परिस्थिती निर्माण होते.
चीन आणि पाकिस्तानदरम्यानचा व्यापारीमार्ग देखील याच प्रदेशातून जातो. इथे आर्थिक महामार्ग निर्माण करण्याचा चीनचा इरादा आहे. या प्रकल्पाला सुरक्षा मिळावी यासाठीही चीन अक्साई चीनवरील आपली पकड सातत्याने घट्ट करण्याचा प्रयत्न करत असतो.
काही दिवसांपूर्वी लडाखमधील पँगोंग तसो या तलावाच्या प्रदेशात अशीच तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. या तलावाच्या ४५ किमी क्षेत्रफळाचा भाग हा भारतात तर, ९० किमी क्षेत्रफळाचा भाग हा चीनमध्ये आहे. भारत आणि चीन दरम्यान निश्चित केलेली प्रत्यक्ष नियंत्रण रेषा या तलावातून जाते.
चीनकडून होणाऱ्या अतिक्रमणाच्या बहुतांश घटना या याच तलावाच्या परिसरात होत असतात. १९६२ साली चीनने भारतावर याच प्रदेशातून हल्ला चढवला होता. चीनने आपल्या भागात या तलावापर्यंत रस्ते बांधल्याचेही सांगितले जाते.
अक्साई चीनचा प्रदेश आणि भारत-पाकिस्तान दरम्यानचा वादग्रस्त प्रदेश दोन्हीही जवळजवळ आहेत.
भारत-पाकिस्तान दरम्यान जर युद्ध झालेच अक्साई चीनचा भूभाग भारतासाठी फायद्याचा ठरू शकतो. कारण, या प्रदेशातून या युद्धावर नियंत्रण ठेवता येणे शक्य आहे. चीनसाठीही मध्य आशियातून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी हा प्रांत महत्वाचा आहे.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या करारानुसार या भागात कोणत्याच देशाने पायाभूत सुविधा किंवा लष्करी सुविधा उभारायच्या नाहीत असे ठरलेले असताना देखील चीनने या भागात आपल्या बाजूने पायाभूत सुविधांचं जाळंच उभारलं आहे.
याला देखील भारताचा विरोध आहे. मात्र चीन त्याला न जुमानता आपल्या पायाभूत सुविधा कायम राहाव्यात यासाठी अट्टाहास करत आहे.
जोपर्यंत सीमा निश्चिती होत नाही, तोपर्यंत सीमावादाचे मोठ्या तणावजन्य परिस्थितीत रुपांतर होऊ शकते. अशावेळ युद्धजन्य परिस्थिती निर्माण होणार नाही हे पाहणं बोर्डर मॅनेजमेंट समितीचं काम आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी या समितीच्या प्रतिनिधींच्या आजवर २० हून अधिक बैठका झाल्या आहेत.
चीनने या वादग्रस्त सीमांच्या जवळच्या प्रदेशातून लष्करी सुविधा उभारल्या आहेत. त्यामुळे लष्करी हालचाली करणे त्यांच्यासाठी सहज शक्य आहे.
अक्साई चीनचा प्रदेश भारतासाठी जसा सामाजिकदृष्ट्या महत्वाचा आहे तसाच तो राजनैतिकदृष्ट्याही महत्वाचा आहे. त्यामुळे आता भारतानेही या सिमांच्या लगत आपल्या बाजूने लष्करी सुविधा, रस्त्यांचे जाळे उभारले पाहिजे. म्हणजे चीनच्या वाढत्या हालचालींना प्रत्युत्तर देणे सोपे होईल.
भारताने सातत्याने अक्साई चीनवर दावा केला पाहिजे. ज्यामुळे चीनची पाकिस्तानला होणारी मदतही रोखली जाईल.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.