आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
क्रिकेट या खेळामध्ये नेहमीच काही न काही वाद सुरू असतात. कधी दोन खेळांडूंमध्ये वाद होतात तर कधी मॅच फिक्सिंगमध्ये एखादा खेळाडू अडकलेला दिसतो. भारतीय क्रिकेट बोर्ड जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. तरी देखील आपल्याकडे फिक्सिंग आणि भ्रष्टाचाराचे काही प्रकार घडलेले आहेत. अशा प्रकारांमुळं काही खेळाडूंचं संपूर्ण क्रिकेट करियर उद्ध्वस्त झालेलं आहे. अशा खेळाडूंच्या यादीत एक असं नाव आहे जो भारतासाठी फक्त एकच एकदिवसीय सामना खेळला आणि निवड समितीतील सदस्यांना लाच देण्याच्या प्रकरणात अडकला! याचा परिणाम म्हणून त्याची संपूर्ण कारकीर्द डळमळीत होऊन गेली. अभिजित काळे, असं या खेळाडूचं नाव आहे.
२००३ मध्ये महाराष्ट्रीयन खेळाडू अभिजित काळेवर राष्ट्रीय निवड समितीतील दोन सदस्यांना लाच दिल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) त्याच्यावर एक वर्षाची बंदी घातली होती. राष्ट्रीय निवड समितीतील सदस्य किरण मोरे आणि प्रणव रॉय यांनी अभिजित काळेची तक्रार केल्यानंतर हे प्रकरण पहिल्यांदा चर्चेत आलं होतं.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी काळेनी लाच देऊ केल्याचा आरोप मोरे आणि रॉय यांनी केला होता. मात्र, अभिजितनं हे आरोप फेटाळून लावले. तरी देखील त्याला बीसीसीआयच्या कारवाईला सामोरं जावं लागलं. अभिजितच्या विरोधात बीसीसीआयकडे पुरेसे पुरावे उपलब्ध नव्हते. त्यामुळं त्याच्यावर मोठी कारवाई झाली नाही.
आपल्यावर झालेल्या आरोपांबाबत अभिजितनं बीसीसीआयला एक माफीचं पत्र दिल्याचं सांगितलं जातं. आपण आपल्या पालकांच्या मदतीनं निवड समितीच्या सदस्यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला होता मात्र, लाच दिली नव्हती. या प्रकारामुळं बोर्डाची आणि क्रिकेटची प्रतिमा मलिन झाली असेल तर मी माफी मागतो, असं त्यानं या पत्रात म्हटलं होतं.
आपली जवळची व्यक्ती संकटात सापडली की, आपण त्याचा बचाव करण्याचा प्रयत्न करतो, हा एक अलिखित नियमच आहे. यानुसार बीसीसीआयच्या कारवाईनंतर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननं(एमसीए) मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. एमसीएचे तत्कालीन अध्यक्ष ज्ञानेश्वर आगाशे यांनी अभिजितवर झालेल्या कारवाईनंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. ‘अभिजितवर झालेले आरोप गंभीर आहेत. मात्र, त्याने ते फेटाळून लावले आहेत. या प्रकारामुळं त्याचा खेळाचं मोठं नुकसान झालेलं आहे. जर खरंच त्यानं लाच दिली नसेल तर बीसीसीआयनं घेतलेला कारवाईचा निर्णय नक्कीच अन्यायकारक ठरेल. त्यामुळे बोर्डानं आपल्या निर्णयावर पुनर्विचार करावा’, अशी विनंती आगाशे यांनी केली होती.
‘बीसीसीआयनं जरी अभिजीतवर कारवाई केली होती तरी महाराष्ट्रातील निवडकर्ते त्याला रोखणार नाहीत. जर तो तंदुरुस्त असेल आणि त्याच्या कामगिरीमध्ये सातत्य असेल तर स्थानिक स्पर्धांसाठी त्याची नक्कीच निवड केली जाईल’, असा पवित्रा देखील एमसीएनं घेतला होता. या सर्व प्रकरणावर भारतीय क्रिकेट मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी देखील भाष्य केलं होतं. अभिजित काळेविरुद्ध निवड समितीच्या सदस्यांना पैसे देण्याचं मजबूत प्रकरण होतं. मात्र, पुरेसे पुरावे उपलब्ध नसल्यानं शिस्तपालन समितीनं त्याच्यावर कठोर कारवाई केली नाही, असं दालमियांचं म्हणण होतं.
लाच देण्याच्या आरोपांमुळं क्रिकेट कारकीर्द संकटात आलेल्या अभिजितचा जन्म (४ जुलै १९७३) महाराष्ट्राच्या मध्यभागी असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात झाला आहे. तो उजव्या हातानं फलंदाजी करत असे याशिवाय तो ऑफब्रेक गोलंदाज देखील होता. मार्च १९८८ मध्ये सचिन तेंडुलकरसह मुंबईतील सर्वात आशादायक कनिष्ठ क्रिकेटपटू अभिजितची निवड करण्यात आली होती. त्यानं स्थानिक क्रिकेटमध्ये अनेक महत्त्वपूर्ण खेळी केल्या. मात्र, अभिजितला मुंबईच्या रणजी संघात स्थान मिळालं नाही. त्यामुळं तो महाराष्ट्राच्या संघाकडून खेळू लागला.
महाराष्ट्र संघाच्या मधल्या फळीतील तो एक महत्त्वाचा खेळाडू होता. मार्च १९९२ मध्ये त्यानं न्यूझीलंडच्या १९ वर्षांखालील संघाविरुद्ध भारताच्या राष्ट्रीय संघामध्ये प्रवेश केला होता. न्यूझीलंडविरुद्ध १५३ धावा करून राहुल द्रविडला देखील मागं टाकलं होतं. डिसेंबर १९९३ मध्ये त्यानं बडोद्याविरुद्ध प्रथम श्रेणी सामन्यात देखील त्यानं १३२ धावा केल्या होत्या. नोव्हेंबर २००१ मध्ये त्यानं इंग्लंडच्या ‘ए’ संघाविरुद्ध १२२ धावांची खेळी केली.
स्थानिक क्रिकेटमध्ये अभिजितच्या कामगिरीतील सातत्य पाहून निवड समितीनं त्याची भारताच्या राष्ट्रीय संघात निवड केली. २००३च्या टीव्हीएस कपमध्ये त्याला संधी मिळाली. ढाका येथे बांगलादेशविरुद्ध तो आपला एकमेव एकदिवसीय सामना खेळला. त्या सामन्यात त्यानं १० धावा केल्या होत्या. त्यानंतर लगेचच तो लाच देण्याच्या प्रकरणात अडकला.
२००५ पासून त्याला पुन्हा क्रिकेट खेळण्याची परवानगी देण्यात आली. २००९ मध्ये त्यानं एका ओव्हरमध्ये सहा सिक्स मारण्याची कामगिरी केली. ही खेळी वगळता नंतर त्याला विशेष कामगिरी करता आली नाही. २००९ मध्ये लिंडन पार्क सीसी या क्लबसाठी खेळताना, सलग सहा सिक्स मारत एका ओव्हरमध्ये ३९ रन ठोकले होते. यात तीन नो-बॉल्सचा समावेश होता. नंतर त्याला महाराष्ट्राच्या संघातून वगळण्यात आलं म्हणून तो काही दिवस त्रिपुराच्या संघाकडून देखील क्रिकेट खेळला होता. तिथे देखील त्याला सुर गवसला नाही.
अभिजित काळेनं आपल्या कारकिर्दीमध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये ९३ सामने खेळले. त्यात त्यानं ५४.४५ च्या सरासरीनं ७ हजार १३४ धावा केल्या. नाबाद २४८ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. लिस्ट ए करियरमध्ये त्यानं ६५ सामने खेळून ४४.९१ च्या सरासरीनं २ हजार १११ धावा केलेल्या आहेत.
प्रत्यक्षात मैदानापासून दूर गेल्यानंतर अभिजितनं नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. पुण्यातील कोरेगाव पार्क येथे त्यानं ‘क्रिकटेन स्पोर्ट्स अकॅडमी’ स्थापन केलेली आहे. डिसेंबर २०१९ मध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वरिष्ठ निवड समितीच्या अध्यक्षपदी अभिजित काळेची निवड करण्यात आली. त्यानं महाराष्ट्राचे माजी कर्णधार मिलिंद गुंजाळ यांची जागा घेतली.
अभिजित अतिशय प्रतिभावान खेळाडू होता. त्यानं खरोखर निवड समितीतील सदस्यांना लाच दिली होती की, नव्हती हे त्यालाच माहिती. मात्र, एका वादग्रस्त प्रकरणामुळं त्याची कारकीर्द संकटात आली, हे नक्की.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.