आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
विज्ञान, कला, साहित्य, शांतता आणि अर्थशास्त्र या विषयात प्रदान करण्यात येणारे नोबेल पारितोषिक गेल्या शतकभरातील मानवी प्रगतीचा एक मानबिंदू बनले आहे. भारतातील अनेक वैज्ञानिक, सामाजिक कार्यकर्ते, अर्थतज्ञ या पुरस्काराचे मानकरी ठरले असले तरी भारताला अजूनही अनेक विषयात एक मैलाचा दगड गाठायचा आहे, त्या अनुषंगाने भारतीयांचे कार्य सदैव सुरूच असते. पण एकीकडे भारतात ही प्रगती सुरू असताना भारताचा शेजारी असलेला पाकिस्तान मात्र या विषयात ही कमनशिबी ठरला आहे.
आजतागायत पाकिस्तानातील केवळ एकाच व्यक्तीला हा पुरस्काराचा सन्मान मिळाला आहे. ती व्यक्ती आहे अब्दुस सलाम!
त्यांना विज्ञान क्षेत्रांतील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
२९ जानेवारी १९२६ रोजी पश्चिम पंजाबच्या झांग जिल्ह्यातील एका अहमदिया कुटुंबात अब्दुस सलाम यांचा जन्म झाला होता. ते ज्या भागात जन्माला आले तो भाग फळणीनंतर पाकिस्तानात गेला.
अब्दुस सलाम हे बालपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांनी शालेय जीवनातच आपल्या विद्वत्तेचे प्रदर्शन करण्यास सुरुवात केली होती. ते नेहेमीच चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत. वयाच्या फक्त १४ व्या वर्षी त्यांनी पंजाब विद्यापीठाच्या मॅट्रिक परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवले.
पंजाब विद्यापीठाने त्यांचा असामान्य बुद्धीचे कौतुक करत त्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली आणि त्यांच्या पुढील शिक्षणाचा खर्च ब्रिटिश सरकारने उचलला.
ते एक व्हर्सटाईल स्कॉलर होते, त्यांना उर्दू भाषाशास्त्र आणि इंग्रजी भाषाशास्त्र यात प्रामुख्याने रस होता. अब्दुस सलाम यांची अभ्यासातील प्रगती बघता त्यांच्या शिक्षकांनी त्यांना इंग्रजी विषयाचा प्राध्यापक होण्याची विनंती केली. परंतु अब्दुस सलाम यांचे भाषाशास्त्राहुन अधिक प्रेम गणितावर होते.
गणित, भूमिती, प्रमेय, सिद्धांत याचा अभ्यास करण्यातच ते आपला जास्तीतजास्त वेळ घालवायचे. आपल्या गणितप्रेमासाठी त्यांनी प्राध्यापकाची नोकरी नाकारली.
अब्दुस सलाम यांच्या पित्याला त्यांच्याकडून फार अपेक्षा होत्या आणि या अपेक्षांचे ओझे त्यांनी अखेरीस अब्दुस सलाम यांच्यावर लादले आणि त्यांना प्रशासकीय सेवेची अर्थात ब्रिटिशकाळातील आयसीएसची परीक्षा द्यायला सांगितली. त्याकाळी ही परीक्षा मोठ्या प्रतिष्ठेची मानली जात असे, या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या व्यक्तीला सरकारी सेवेत नोकरी आणि समाजात मोठे सन्मानाचे स्थान प्राप्त होत असे.
आज यूपीएससी ही परीक्षा भारतात घेते, ज्याला ८ ते १० लाख परिक्षार्थी दरवर्षी बसतात.
तर अब्दुस सलाम यांना आय सी एसच्या परीक्षेला बसण्याची त्यांच्या वडिलांनी विनंती केली खरी पण ते काही त्या परीक्षेला बसले नाही, त्याऐवजी त्यांनी रेल्वे बोर्डाच्या परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला. परंतु या परीक्षेत सलाम यांना यश कमवता आले नाही आणि ते अनुत्तीर्ण झाले. खरंतर या परीक्षेत त्यांचे ज्ञान कुठेच कमी पडले नव्हते परंतु शारीरिक चाचणीवेळी घेण्यात येणाऱ्या ऑप्टिक टेस्टमध्ये ते बाद झाले. अब्दुस सलाम त्यांच्या पित्याचे स्वप्न पूर्ण करू शकत नव्हते याचे त्यांना प्रचंड दुःख होते. या दुःखातूनच पुढे मार्ग काढत त्यांनी आपला गणित आणि विज्ञानाचा आभ्यास सुरू ठेवला.
त्यांनी लाहोरच्या सरकारी महाविद्यालयातुन गणितात एम. ए. पूर्ण केले. पुढे त्यांना फिजिक्स या विषयात रस निर्माण झाला आणि त्यांनी त्यावरच संशोधन करायला सुरुवात केली.
१९५४ साली त्यांनी पाकिस्तान ॲकॅडमी ऑफ सायन्समधून फेलोशिप मिळाली. त्याअगोदर १९५३ साली ते केम्ब्रिज विद्यापीठात आपले पुढील संशोधन करायला गेले आणि सेंट जॉन्स कॉलेजमध्ये ते गणिताचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले.
१९५७ साली सलाम यांची इम्पेरीयल कॉलेज ऑफ लंडन येथे नेमणूक करण्यात आली, त्याचवेळी त्यांना पाकिस्तान सरकारच्या इस्लामाबाद विद्यापीठाने मानद डॉक्टरेट बहाल केली. याच काळात अब्दुस सलाम यांनी पाकिस्तानातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सुरू केली.
१९५९ साली वयाच्या फक्त ३३ व्या वर्षी अब्दुस सलाम यांची रॉयल एशियाटिक सोसायटीमध्ये निवड करण्यात आली, हा अल्पवयात त्यांनी मिळवलेला सर्वोच्च सन्मान होता.
अब्दुस सलाम यांनी आपला अभ्यास सुरू ठेवला,
१९७९ साली त्यांनी स्टीव्हन वेईनबर्ग, शेल्डज ग्लेशो यांच्या समवेत इलेक्ट्रोविक युनिफिकेशन थियरीसाठी भौतिकशास्त्राचे नोबेल प्रदान करण्यात आले.
हा पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले पाकिस्तानी होते. जगदीश पती या भारतीय-अमेरिकन शास्त्रज्ञासोबत त्यांनी मूलभूत संशोधन करून पती सलाम थियरी नावाच्या भौतिकशास्त्रातील एका महत्वपूर्ण सिद्धांताला आकार दिला.
पाकिस्तान सरकारने त्यांचा गौरव करत त्यांना पाकिस्तानच्या सर्वोच्च पुरस्काराने त्यांना सन्मानित केले होते. अब्दुस सलाम यांनी पाकिस्तानात भौतिकशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या संस्था सुरू केल्या होत्या, अनेक विद्यार्थी या संस्थांमध्ये शिक्षण घेत होते.
पाकिस्तानमधून अनेक भौतिकशास्त्रज्ञ घडवण्याचा त्यांचा मानस होता पण पाकिस्तान सरकारने एक कायदा केला ज्यामुळे त्यांच्या सर्व योजनेवर पाणी फिरले. पाकिस्तानने अहमदिया समुदायाला गैर मुस्लिम ठरवण्याचा ठराव संसदेत पारीत केला. अब्दुस सलाम याच समुदायाचे होते. पाकिस्तानी संसदेच्या निषेधार्थ त्यांनी पाकिस्तानचा त्याग केला आणि ते ब्रिटनला कायमचे स्थायिक झाले. तिथे त्यांनी अनेकाना भौतिकशास्त्राचे धडे दिले. पुढे, त्यांच्या एका विद्यार्थ्यांला नोबेल पारितोषिक देखील मिळाले.
अब्दुस सलाम हे आयुष्यभर भौतिकशास्त्राची सेवा केली, त्यात अमूल्य योगदान दिले. पाकिस्तानातील लोकांना विज्ञानाच्या वाटेवर आणण्याचे असफल प्रयत्न केले पण त्यांना काही यश मिळवता आले नाही. उलट त्यांच्याच समुदायाला अवमानित करण्यात आले. धार्मिक प्रेरणेने ग्रस्त पाकिस्तान आपल्या देशातील एकमेव नोबेल विजेत्याचा देखील सन्मान करू शकला नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.