आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
भारतात अनेक घोटाळे झाले आहेत. या सर्व घोटाळ्यांच्या मागे वेगवेगळ्या कथा आहेत. ज्या शिताफीने हे घोटाळे करण्यात आले आहेत, ते बघता घोटाळेबाजांच्या चातुर्याचा अंदाज आपण लावू शकतो. या सर्व घोटाळ्यांत राजकारण्यांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभाग राहिला आहे. अशाच एका घोटाळ्याची ही गोष्ट, ज्याने भारताला आतून बाहेरून हादरवून सोडलं होतं.
तब्बल ४,८०० कोटींचा हा घोटाळा होता आणि हा घोटाळा एकाच माणसाने केला होता, तो माणूस म्हणजे अब्दुल करीम तेलगी.
ही गोष्ट आहे भारतात गाजलेल्या प्रसिद्ध तेलगी मुद्रांक घोटाळ्याची, एखाद्या चित्रपटाला शोभावं असं कथानक ह्या घोटाळ्याला आहे. यावर ‘स्कॅम 2003’ या चित्रपटाची निर्मिती देखील करण्यात आली आहे. बंगलोरला बदली झालेले पोलीस अधिकारी के. एम. धिंग्रा यांनी एका कारागृहाला भेट दिली. त्यांनी बघितलं की कारागृहाच्या एका खोलीत एक टेबल होता, त्यावर चारपाच मोबाईल पडले होते.
एक माणूस बसला होता. त्याला धिंग्रा यांनी विचारलं बंगलोरच्या नव्या घरात काय वाटतं? त्यावर त्याने प्रतिक्रिया दिली की ‘विशेष काही नाही मी फक्त माझे ऑफिस मुंबईहून इकडे शिफ्ट केले आहे.’
जेलमध्ये देखील हा माणूस इतका निवांत होता, हे केवळ त्याच्या राजकारण आणि सिस्टममध्ये असलेल्या ओळखीमुळे आणि प्रभावामुळे शक्य झाले होते. त्याच वर्षी जानेवारी महिन्यात महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या दोन वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मुंबईतल्या कुलाबा परिसरातील एका आलिशान बंगल्याला भेट दिली, त्याठिकाणचं दृश्य बघून त्यांना धक्काच बसला. तो माणूस, त्याच्या केसचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांसोबत बसून बिर्याणी खात गप्पा मारत बसला होता. आपल्या राजकीय ओळखीमुळे गुन्हा करून देखील हा गुन्हेगार मोकाट होता.
या गुन्हेगाराचं नाव होतं अब्दुल करीम तेलगी.
तेलगीला त्याच्या नव्वद दिवसांच्या कारावासात कधीच जेलमध्ये बंद करण्यात आलं नाही. त्याला सर्वत्र मोकळीक मिळाली होती. हे सर्व शक्य झालं होतं, ते त्याचा राजकीय आणि सामजिक संघटनांशी असलेल्या लागेबंधामुळे!
तेलगीच्या घोटाळ्याच्या संदर्भात जेव्हा तेलगीची नार्को चाचणी केली, तेव्हा ५३ टेपमध्ये त्याने आपल्या घोटाळ्याचा खुलासा केला होता. त्याच्या या खुलाशामुळे सबंध देश हादरला होता.
बेळगाव जवळच्या खानापूरला तेलगीचा जन्म झाला. तेलगीला मुंबईला जाऊन धंदा करायचा होता. त्याचे वडील रेल्वे कर्मचारी होते. त्याने मुंबईला येऊन हॉटेल मार्केटिंगचा आणि टुरिझमचा व्यवसाय चालू केला. यात त्याने फेक व्हिसा तयार करण्याचे प्रताप केले त्यामुळे त्याला धंदा हा बंद करावा लागला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं.
पुढे त्याने प्रताप सोनी नावाच्या मुद्रांक विक्रेत्याशी संपर्क केला आणि त्याच्या मुद्रांकांच्या विक्रीच्या कामात १.५ टक्के कमिशनवर काम करू लागला. पुढे त्याने स्वतःसाठी मुद्रांक विक्रीचे लायसन्स मिळवले.
यासाठी त्याने अनिल गोटे या आमदाराकरवी शरद पवार सरकारमधील मंत्री विलासराव देशमुख यांच्याकडून मुद्रांक विक्रीचं लायसन्स मिळविलं. मार्च १९९४ मध्ये त्याने पोलीस कोर्ट लेन, फिएन्स मॅन्शन या मुंबईच्या फोर्ट भागातील अत्यंत उच्चभ्रु वस्तीत आपलं ऑफिस चालू केलं.
१९९५ साली सोनी सोबतच्या पार्टनरशिपमुळे तेलगी संकटात सापडला. मुंबई पोलिसांनी त्याच्या विरोधात बनावट मुद्रांक विक्रीचा गुन्हा दाखल केला. पण या काळात त्याने स्वतःला वाचावण्यासाठी एक पुरेपूर योजना आखली होती. त्याने या व्यवसायाला समांतर अशा सिक्युरिटी प्रेसची सुरुवात केली होती.
त्याने एका व्यावसायिकाचे कौशल्य वापरून माधव तुकाराम कुल्ठे या सिक्युरिटी प्रेसमध्ये काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याला कामावर घेतले. त्याला प्रिंटींग, पेपरची साईज आणि सप्लायर चेनची बऱ्यापैकी माहिती होती.
१९९६ पर्यंत तेलगी मुद्रांक व्यवसायाचा तज्ञ बनला होता.
त्याने इंडियन सिक्युरिटी प्रेसच्या कार्यालयात काम करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांना हाताशी धरून प्रिंटींग मशीन तयार करून घेतल्या व आपल्या मुंबईच्या ऑफिसात त्यांच्या बळावर बनावट मुद्रांक तयार करायला सुरुवात केली.
हे मुद्रांक हुबेहूब सिक्युरिटी प्रेसच्या मुद्रांकाप्रमाणे असत.
त्याने अनेक अनुभवी व्यक्तींना या बनावट मुद्रांकांच्या विक्रीसाठी कामावर ठेवले. हे मुद्रांक विकून मोठ्या प्रमाणावर पैसे कमावू लागला. सुशांत कुमार दास या त्याचा एका कर्मचाऱ्याने त्याचा अटकेच्या दिवसापर्यंत या मुद्रांकांची विक्री केली होती. १९९० च्या शेवटी तेलगीचा व्यवसाय हा शंभर कोटीच्या घरात गेला.
१९९५ साली कोर्टाने त्याला एका प्रकरणात शिक्षा सुनावली पण त्याने ती शिक्षा भोगलीच नाही. तो कधी जेलमध्ये देखील गेला नाही. हे सर्व शक्य झालं होतं त्याच्यावर असलेल्या राजकीय वरदहस्तामुळे!
त्याने मिळवलेल्या पैशावर अनेकांना हज यात्रेसाठी आर्थिक मदत केली. त्याने मून मून दत्ताला घेऊन एका चित्रपटाची निर्मिती देखील केली होती. २००१ साली त्याला अजमेरमध्ये अटक करण्यात आली.
अटक होऊन देखील तो चैनीत जगत होता. त्याने त्याचं केसशी संबंधित सर्व पोलीस आणि सनदी अधिकाऱ्यांचे खिशे गरम केले होते. त्याच्यामुळे त्याचे काम पोलीस कोठडीत पण कधी अडत नव्हतं.
कर्नाटक सरकारने हुशारी दाखवून www.stampIT.info ही वेबसाईट सुरु केली.
या वेबसाईटमुळे लोकांना खऱ्या मुद्रांकांची ओळख पटवणे शक्य झाले यामुळे तेलगीच्या काळ्या धंद्याची पोलखोल झाली. कोलाबामधील एका हॉटेलमधून कामत नावाच्या अधिकाऱ्याने त्याला अटक केली. एवढं असूनही त्याच्या प्रकरणात तपासयंत्रणा उदासीन झाल्या होत्या.
अखेरीस अण्णा हजारेंनी या प्रकरणाविरोधात आणि सरकारच्या धोरणा विरोधात कोर्टात केस दाखल केली. आता मात्र सरकारचं धाबं दणाणलं, त्यांनी चौकशी केली. यात तब्बल ४,८३५ कोटींचा घोटाळा कागदोपत्री उघडकीस आला असला तरी त्याचा आकडा अजून जास्त असल्याचे बोलले जात आहे. तेलगीला या घोटाळ्यामुळे कारावासाची शिक्षा झाली. २३ ऑक्टोबर २०१७ रोजी बंगलोरला कारावासातच तेलगीचा मृत्यू झाला होता.
तेलगी घोटाळ्याने भारतातल्या काळाबाजारी आणि भ्रष्टाचाराचे दुष्टचक्र किती फोफावलं आहे हे जगासमोर आणलं आहे. आपले अधिकारी, लोकनियुक्त प्रतिनिधी यांचा वरद हस्ताने कशा प्रकारे गुन्हेगारी बळकट होत होती याचं तेलगी घोटाळा हे एक जिवंत उदाहरण आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.