आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
प्रत्येक क्रिकेट वर्ल्डकप फायनलच्या पूर्वसंध्येला दोन्ही फायनलिस्ट टीमसाठी एक स्पेशल डिनर आयोजित केला जातो. १९९६साली पाकिस्तानमधील लाहोर शहरात अशीच एक खास मेजवानी आयोजित केली गेली होती. वर्ल्डकपच्या फायनलमध्ये दाखल झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकन टीम्सनी एका अतिशय महत्त्वाच्या पाहुण्याच्या उपस्थितीत एकत्र जेवण केलं. तो पाहुणा म्हणजे, त्यावर्षीची वर्ल्डकप ट्रॉफी होती.
जेवण झाल्यानंतर उत्साही ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी त्या ट्रॉफीसोबत फोटोसेशन करून घेतलं. पहिल्यांदा वर्ल्डकप फायनलमध्ये पोहचलेल्या लंकन खेळाडूंना देखील फोटोसेशन करण्याची इच्छा होती. मात्र, कॅप्टन असलेल्या अर्जुना रणतुंगाच्या एकाच वाक्यानं लंकन खेळाडू जागच्या जागी थांबले. रणतुंगा म्हणाला होता, ‘आत्ताच फोटो काढण्याची गरज नाही कारण उद्या ती ट्रॉफी आपल्याकडेच येणार आहे. मग पाहिजे तेव्हढे फोटो काढा’! हे वाक्य ऐकणाऱ्या कुणालाही वाटेल अर्जुनानं भावनेच्या भरात किंवा अतिआत्मविश्वासानं हे उद्गार काढले होते. मात्र, नाही..
अर्जुनच्या या वाक्यामध्ये फक्त आणि फक्त त्याचा विश्वास होता. आपले कष्ट, आपले खेळाडू, आपला कोच आणि आपल्या रणनितीवरील तो विश्वास होता. कारण, दुसऱ्या दिवशी रात्री गद्दाफी स्टेडियमच्या झगमगत्या दिव्यांखाली क्रिकेटमधील सर्वात मोठ्या अंडरडॉग ठरलेल्या लंकन खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन टीमचं अक्षरश: गर्वहरण केलं होतं. त्यानंतर संपूर्ण जगानं श्रीलंकेच्या विजयाची गाथा लिहिली, ऐकली अन् वाचली. अंतर्गत यादवी, बॉम्बस्फोटांचे चटके, बहिष्कार आणि दिवाळखोर बोर्ड, अशा अनेक संकटांवर मात करून जगाच्या शीर्षस्थानी पोहोचलेल्या एका लहानशा बेटाच्या विजयाची ती गाथा होती.
१९९६ मध्ये आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धा पुन्हा भारतीय उपखंडात आली होती. यावेळी भारत, पाकिस्तान आणि श्रीलंकेनं मिळून या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड्स आणि केनिया ही तीन राष्ट्र पहिल्यांदाच वर्ल्डकप खेळणार होती. एकूण १२ संघांची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली होती. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच अनेक कारणांमुळं श्रीलंका चर्चेत आली होती.
श्रीलंकेमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत यादवी आणि हिंसाचारामुळं ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीजच्या संघांनी सुरक्षेच्या कारणास्तव बेटावर सामने खेळण्यास नकार दिला. आयसीसीनं सुरक्षेचं आश्वासन देऊनही दोन्ही देशांनी लंकेत जाण्यास नकार दिला. त्यामुळं स्पर्धा सुरू झाल्यानंतर आयसीसीनं दोन्ही देशांच्या विरोधात असलेल्या सामन्यांमध्ये श्रीलंकेला विजयी घोषित करून टाकलं.
ऑस्ट्रेलियानं लंकेला अपमानित करण्याचा हा काही पहिलाच प्रयत्न नव्हता. वर्ल्डकप स्पर्धा सुरू होण्याच्या काही महिने अगोदर ऑस्ट्रेलियानं श्रीलंकेचा आणि खेळाडूंना अनेकदा अपमान केला होता. वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी श्रीलंकन संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी यजमानांनी पाहुण्यांना त्रास देण्याची एकही संधी सोडली नव्हती.
नानाविध प्रकारच्या कुरापती करून त्यांचा पाणउतारा केला होता. लंकन कर्णधार अर्जुना रणतुंगानं ही गोष्ट मनात खोलवर कोरून ठेवली आणि खेळाच्या मैदानात आपल्या अपमानाचा बदला घेण्याचा निश्चय केला होता. विशेष म्हणजे या मोहिमेत त्याला एका माजी ऑस्ट्रेलियन खेळाडूनं सर्वतोपरी मदत केली. ही व्यक्ती म्हणजे, श्रीलंकनं संघाचे प्रशिक्षक डेव्ह वॉटमोर होती.
जन्मानं श्रीलंकन असलेल्या डेव्ह वॉटमोर यांनी ऑस्ट्रेलियन संघाकडून क्रिकेट खेळलं होतं. मुथय्या मुरलीधरनच्या नो बॉल प्रकरणाचं झालेलं भांडवल, बॉल टेम्परिंगचे आरोप, ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी केलेली स्लेजिंग या सर्व गोष्टी वॉटमोर यांना माहित होत्या. लंकन खेळाडूंमध्ये प्रचंड प्रतिभा आहे, मात्र, त्यांच्यातील एकतेची आणि प्रखर देशप्रेमाची भावना कुठेतरी खोल रुतून बसली होती.
वॉटमोर आणि रणतुंगा यांनी याच दोन गोष्टी जागृत करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी ग्रीट पर्सिव्हरन्स स्ट्रॅटेजीचा वापर केला. संघातील प्रत्येक खेळाडूच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला. त्यांना त्यांच्या क्षमतेची जाणीव करून दिली. १९९६च्या वर्ल्डकप स्पर्धेमध्ये उतरण्यापूर्वी श्रीलंकन संघानं अतिशय काळजीपूर्वक गृहपाठ केला होता.
लंकन कोच डेव्ह वॉटमोरला प्रत्येक गोष्टीच्या नोट्स ठेवण्याची सवय होती. या नोट्सचा वापर करून त्यानं आणि रणतुंगानं प्रत्येक खेळाडूची तयारी करून घेतली. लंकन संघातील प्रत्येक खेळाडूला त्याची भूमिका समजावून सांगण्यात आली. विरोधी संघातील प्रत्येक खेळाडूला नजरेसमोर ठेवून रणनीती तयार केली गेली. त्यासाठी अगदी व्हिडिओ रिप्ले देखील वारंवार पाहिले गेले. तासन् तास चर्चासत्रे आयोजित केली गेली. संघामध्ये अनेक आश्चर्यकारक बदल करण्यात आले.
पूर्वी सातव्या आणि आठव्या क्रमांकावर खेळणाऱ्या सनथ जयसूर्या आणि कालूवथरना यांच्याकडून ओपनिंग करून घेण्याची आश्चर्यकारक गोष्ट साध्य करण्याची योजना लंकेनं आखली आणि ती यशस्वी करून दाखवली होती. रणतुंगानं त्यांना एकचं सूचना दिली होती, ‘जाऊन फक्त गोलंदाजांची धुलाई करा, बाकीचं मी पाहून घेतो’.
लंकन संघ सर्व पूर्वतयारीनिशी वर्ल्डकप खेळण्यासाठी सज्ज झाला होता. मात्र, वर्ल्डकप स्पर्धा सुरू होण्याच्या काही दिवस अगोदर झालेल्या भयानक बॉम्बस्फोटामुळं लंकेतील सामन्यांवर अनिश्चिततेचं सावट तयार झालं होतं. आपली सर्व मेहनत पाण्यात जाण्याची भीती श्रीलंकेला वाटू लागली होती. मात्र, यावेळी त्यांचे शेजारी आणि सह-आयोजक असलेल्या भारत आणि पाकिस्ताननं त्यांना मदत केली.
दोन्ही देशांनी लंकेत जाऊन आपापले सराव सामने खेळले आणि लंका सुरक्षित असल्याचा सर्वांना विश्वास दिला. भारत आणि पाकिस्तानच्या पाठोपाठ झिम्बाव्बे आणि नवख्या केनियानं देखील लंकेत पाऊल ठेवलं. त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि विडिंज वगळता सर्वांनी आपापले लंकेतील सामने खेळले.
संपूर्ण टूर्नामेंटमध्ये श्रीलंकन संघाचं एक नवीन रूप सर्वांना पहायला मिळालं. सेमीफायनलच्या सामन्यामध्ये कलकत्यातील जवळपास लाखभर प्रेक्षकांच्या गर्दीसमोर लंकन संघानं बलाढ्य भारतीय संघाला पराभूत करण्याची किमया केली होती. सेमीफायनल जिंकून मोठ्या आत्मविश्वासानं लंकन संघ फायनल खेळण्यासाठी पाकिस्तानात गेला होता. कधी काळी एकदम दडपणाखाली वावरणारे खेळाडू ताठ मानेनं जगाचा सामना करण्याचं शिकले होते.
वर्ल्डकप फायनलपूर्वी ते इतके निवांत होते की, काही खेळाडू भर सामन्याच्या दिवशी सकाळी पाकिस्तानातील रस्त्यांवर खरेदीचा आनंद लुटत होते. रणतुंगानं सर्व खेळाडूंना त्यांची भूमिका सांगून ठेवली होती. फक्त एक खेळाडू असा होता, ज्याला एकदम मोकळं सोडण्यात आलं होते. कल्पना करा, अमरिश पूरी काजोलला म्हणतायेत.. ‘जा सिमरन जा जिले अपनी जिंदगी’. अगदी अशीच काहीशी स्थिती रणतुंगा आणि अरविंदा डी सिल्वा यांची होती.
रणतुंगानं डी सिल्वाला पाहिजे ते करण्याची परवानगी दिली होती. पण, त्यासाठी फक्त एक ‘छोटीशी’ अट घातली होती. ‘मला तुझ्या बॅट मधून फक्त शतक पाहिजे!’, अशी ती अट होती. डी सिल्वानं आपल्या कॅप्टनचा मान राखला आणि फायनलमध्ये धुवांधार शतक तर केलंच शिवाय बोलिंग करून तीन विकेट्स देखील घेतल्या. आपल्या अथक परिश्रमांच्या बळावर श्रीलंकेनं १९९६चा वर्ल्डकप आपल्या नावे केला होता.
श्रीलंकन कर्णधार अर्जुना रणतुंगाच्या भाषेत सांगायचं झाल्यास, ‘देशप्रेमानं भारलेल्या १५ लोकांच्या एका टोळक्यानं आपल्या देशाच्या अपमानाचा बदला घेतला होता अन् तोही एकदम सरळ मार्गानं!’
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.