आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
क्रिकेटच्या सामन्यात कधी कुणाचे पारडे जड होईल सांगता येत नाही. पट्टीचे खेळणारे कधीकधी मैदानावर टिकतच नाहीत आणि ज्यांच्याकडून अपेक्षा नसते असे मधल्या फळीतले क्रिकेटवीर सामना काढून देतात.
आज क्रिकेटमधे भारताच्या नावाचा दबदबा असला तरी, एकेकाळी भारताला कमकुवत संघ म्हणून ओळखले जाई. वेस्ट इंडीजसारख्या तगड्या खेळाडूंसमोर भारताचे नवखे, उणीपुरी उंची आणि तब्येत असणारे, खेळाडू काय टिकाव धरतील असा समज सगळ्यांचाच होता. पण, कदाचित तो दिवस फक्त भारताचा होता म्हणूनच आंतरराष्ट्रीय सामन्यात पहिला ऐतिहासिक विजय वेस्ट इंडीज विरुद्धच होता.
ही गोष्ट आहे, १९७१च्या दशकातील. वेस्ट इंडीजच्या खेळाडूंशी तुलना करता उंची आणि शरीरयष्टीच्या बाबतीत भारतीय खेळाडू जरा डावेच वाटत होते. पण, भारतीय खेळाडूंजवळ असणारा एक महत्त्वाचा गुण म्हणजे उत्साह आणि जोश. याच उत्साहामुळे भारतीय संघाने परकीय मैदानावर पहिल्यांदा विजय मिळवला.
६ मार्च १९७१ रोजी झालेल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडीजला १-० अशा फरकाने हरवले.
वेस्ट इंडीजचे कॅप्टन होते, सर गॅरी सॉबर्स. क्रिकेटमधील अनेक विक्रम यांच्या नावावर आहेत. सॉबर्स गोलंदाज म्हणून वेस्ट इंडीज संघात सहभागी झाले. परंतु नंतर त्यांनी आपल्या फलंदाजीतले कौशल्य दाखवून सर्वांना अचंबित केले. क्रिकेटमधील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना सन्माननीय अशी सर ही पदवी देण्यात आली.
पोर्ट ऑफ स्पेनच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात वेस्ट इंडीजने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करून इतकी मोठी धावसंख्या उभी करायची की भारतीय फलंदाजांना त्याचा पाठलाग करता आला नाही पाहिजे, अशी काहीशी सॉबर्सची कल्पना होती.
वेस्ट इंडीजने फलंदाजी करायला सुरुवात केली. पण, भारतीय गोलंदाजांनी त्यांच्या मनसुब्यावर पाणी फिरवले. भारतीय संघाचे कॅप्टन होते अजित वाडेकर, त्यांनी वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या आबिद अलीला गोलंदाजी करण्यासाठी उतरवले. शेवटपर्यंत आबिद आलीच्या फरकी चेंडूचा अंदाज वेस्ट इंडीजच्या खेळाडूंना आलाच नाही.
आबिदने चेंडूला असा काही स्विंग दिला की, वेस्ट इंडीजचे फलंदाज चक्रावून गेले. आबिदच्या या शानदार गोलंदाजीमुळेच त्यादिवशी भारतीय संघाला आपल्या विजयाचा इतिहास रचणे शक्य झाले. त्याने ४२ धावांवर २ विकेट घेतल्या होत्या.
सोबतच बिशन सिंह बेदी, ई प्रसन्ना यांच्या जोडीने तर धमालच केली. जसे काही यांच्यात विकेट घेण्याची स्पर्धाच लागली होती. झाले! वाडेकरने या दोघांनाच आलटून पालटून मैदानात उतरवले. दोघेही स्पिन गोलंदाजीसाठी खूपच प्रसिद्ध होते. वाडेकरची ही युक्ती कमी आली. त्यांच्या माऱ्यासमोर वेस्ट इंडीजचे फलंदाज अगदी बावचळून गेले होते. त्यांना ना धड चेंडू मारता येत होता ना सोडता येत होता.
या दोघांच्या गोलंदाजीला कसे उत्तर द्यावे हेच नेमके न सुचल्याने वेस्ट इंडीजची धावसंख्या जेमतेमच राहिली. ई प्रसन्ना आणि बिशन सिंहच्या जोडीने एकूण ७ विकेट घेतले. प्रसन्नाने ४ तर बिशन सिंहने ३ विकेट.
वेस्ट इंडीजची दमदार टीम २१४वरच ऑल आउट झाली. भारताचा विजयापर्यंतचा मार्ग तर आता तयार झाला होता. आता गरज होती आणखी जोशात फलंदाजीची चुणूक दाखवण्याची. भारतीय फलंदाजांना २१४ धावांचा पाठलाग करायचा होता. सुनील गावस्कर हे नाव त्यावेळी क्रिकेट क्षेत्रात अगदीच नवे होते. सुनील गावस्करने ६५ धावा काढत आपले अर्धशतक पूर्ण केले.
पण सगळ्यात कमाल केली ती चौथ्या क्रमांकावर मैदानात आलेल्या दिलीप सरदेसाई याने ११२ धावांची भर घालून भारताचा विजयच जणू निश्चित केला होता. सुरुवातीला सुनील गावस्कर आणि मांकड यांचा खेळ तर व्यवस्थित झाला होताच. पण, तरीही त्यांच्या खेळातील कमतरता सरदेसाईंनी पूर्ण केली.
वाडेकर या सामन्यात शून्यावरच आउट झाला होता पण सोलकरच्या अर्धशतकामुळे सामना हातातून जाताजाता सावरला होता. ३५२ धावसंख्या झाल्यावर भारतीय संघ ऑल आउट झाला.
वेस्ट इंडीज संघाला दुसऱ्या इनिंगमधेही मोठी धावसंख्या गाठता आली नाही. यावेळी त्यांची धावसंख्या होती २६२ धावा.
पहिल्या इनिंगमधे सुनील गावस्करने अर्धशतक ठोकले तर दुसऱ्या फेरीत इनिंगमधेही त्याने अर्धशतक ठोकून शेवटपर्यंत नाबाद राहिले. यावेळी भारताला फक्त १२४ धावांचे आव्हान होते. इतक्या धावा तर भारत सहज पार करेल यावर अजित वाडेकर यांच्या विश्वास होता आणि सर्व संघातील खेळाडूंनी हा विश्वास सार्थ करून दाखवला.
सुनील गावस्करची ओळखही याच सामन्याने करून दिली. पुढे त्याने अनेकदा उत्तमोत्तम कामगिरी केली आणि अनेक विक्रम देखील नोंदवले. दुसऱ्या सामन्यात गावस्करने ७ चौकार ठोकले आणि आपल्या खेळाने भारताला विजयाच्या जवळ पोहोचवले.
या सामन्यात अंतिम विजय भारताचाच झाला. भारताने ७ विकेट राखून ही मॅच जिंकली.
या विजयाने परकीय मैदानावरही भारतीय संघ आपला खेळ दाखवू शकतो आणि त्यात यशस्वीही होऊ शकतो हा आत्मविश्वास निर्माण झाला. भारतीय संघाला कुणी दुबळे समजून खेळण्याची गरज नाही हा संदेशही या खेळाद्वारे सर्वांपर्यंत पोहोचला. खेळात कधी कुणाचे पारडे जड होईल ते सांगता येत नाही, असे विधान पूर्वीच केले आहे. त्याचीच प्रचीती हा लेख वाचल्यावर येतो.
तेंव्हापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे भारताच्या नावाचाही दबदबा निर्माण झाला जो आजतागायत कायम आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.